सामाजिक उपक्रम
चारधाम यात्रेचे पंचेवीस हजार दिले शाळेच्या विकासासाठी, सरपंच तेजाबाई मिटकर यांचा आदर्शवत उपक्रम

वागदरी : वागदरीच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती तेजाबाई शिवाजीराव मिटकर यांनी चारधाम यात्रेसाठी मुलांनी दिलेली पंचवीस हजार रुपयांची रक्कम जि.प.प्रा.शाळेच्या विकासासाठी दिली.
मिटकर कुटुंबीयांनी वागदरी गावासाठी दिलेले योगदान पाहून ग्रामस्थांनी वर्षभरापूर्वी तेजाबाई मिटकर यांना सरपंच पदी बसवले.मागील वर्षभरात श्रीमती मिटकर यांनी गावांमध्ये बंदिस्त नाली,शाळा सुशोभीकरण, ग्रामपंचायत कार्यालय नूतनीकरण,स्ट्रीट लाईट,सिमेंट बंधारा ईत्यादी कामांची सुरुवात करून लोकार्पण ही केले. गावामध्ये चोवीस तास स्वच्छ व शुद्ध पाणी देण्याच्या हर घर नल योजनेच्या सत्तेचाळीस लाखांच्या पाईपलाईन योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.तसेच मराठा स्मशानभूमी पेव्हर ब्लॉक बसवणे,मुस्लिम स्मशानभूमी सिमेंट रस्ता आदि कामांचे भूमिपूजन झाले आहे.तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्ता मंजूर झाला आहे.
शासनाने दि.30 नोव्हेंबर 23 च्या शासन निर्णयाने राज्यभरात “मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा”हे अभियान सुरू केले आहे या अभियानात क्रमांक आणायचा निर्णय वागदरी ग्रामस्थांनी केला आहे.अल्पावधीतच याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे यासाठी सरपंच तेजाबाई मिटकर यांनी 25 हजार रुपये देऊन या अभियानाची सुरुवात केली आहे. ग्रामस्थांनी हे अभियान यशस्वी करण्याच्या निर्णयाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.