सोलापूर

रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

रस्त्या अपघाताच्या ठिकाणी रुग्णवाहिका तात्काळ पोहोचेल यासाठी आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी

 

संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात
– जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

*रस्त्या अपघाताच्या ठिकाणी रुग्णवाहिका तात्काळ पोहोचेल यासाठी आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी

सोलापूर, :- जिल्ह्यात ज्या ठिकाणी अपघातांचे प्रमाण अधिक आहे त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस विभाग यांनी रस्ते सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करून रस्ते अपघात होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून रस्ते अपघातांना प्रतिबंध घालावा आणि प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षेबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, उपप्रादेशिक अकलूज अमरसिंह गवारे, अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक स्वप्निल कासार, सहायक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा मच्छींद्र पंडीत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सुधाकर चाटे, पोलीस निरीक्षक रविंद्रनाथ कृष्णा भंडारे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे तसेच महामार्ग सुरक्षा पथकाचे अधिकारी व संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्तीकेयन म्हणाले की, संबंधित सर्व यंत्रणांनी जिल्ह्याच्या ज्या राष्ट्रीय, राज्य व जिल्हा रस्त्यावर अपघात मोठ्या प्रमाणावर होत आहेत त्या ठिकाणी लाईटची सुविधा, गतीरोधक, चिन्हांकित बोर्ड व आपत्कालीन हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून द्यावेत. तसेच वाहतूक पोलीस यंत्रणेने माईक सिस्टीमचा वापर करून वाहनधारकांना वेळोवेळी अस्थिर वाहतूकीबाबत सूचना कराव्यात. वाहनचालकांची मद्यपान तपासणी नियमितपणे करावी, ज्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी अपघात प्रवण क्षेत्रातील रस्त्यांची वेळोवेळी तपासणी करावी. रस्त्यांवरील दोष, अडथळे किंवा अपुरी सुविधा यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशा ठिकाणी तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे.आरोग्य विभागाला अपघाताच्या ठिकाणी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे व अपघातग्रस्त व्यक्तींना त्वरित उपचार करण्याचे सांगून
अपघातानंतरच्या ‘गोल्डन अवर’मध्ये योग्य उपचार मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात, असे जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी म्हटले.
जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी स्पष्ट केले की, रस्ता सुरक्षा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहन चालविताना वेगमर्यादा पाळणे, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर करणे, मद्यपान करून वाहन न चालविणे या बाबींचे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अपघाताच्या आकडेवारीसह केलेल्या उपाययोजनांचा आढावा बैठकीत सादर केला. वाहतूक नियंत्रण, मद्यपान तपासणी, वाहनधारकांना जनजागृती, तसेच महामार्गांवर गस्त वाढविणे यासंबंधी माहिती देण्यात आली. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी वाहन तपासणी मोहिमेची माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button