मुनगंटीवारांच्या ‘धक्कादायक’ पराभवाचे खापर कुणाच्या डोक्यावर..?

चंद्रपूर(नरेंद्र सोनारकर):
राज्याचे वन,मत्स्यव्यवसाय,व संस्कृतिक कार्यक्रम मंत्री,जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर-वणी-आर्णी या लोकसभा निर्वाचन क्षेत्रातून धक्कादायक पराभव झाला आहे.इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी दोन लाख 60 हजार मतांची लीड घेत घवघवीत यश संपादन केले.लढतीत मुनगंटीवार पराभूत झाले ,प्रत्यक्ष नरेंद्र मोदी पराभूत झाले; हा चिंतन आणी मंथनाचा विषय असला तरी राज्यातील राजकारणात ‘विकास पुरुष’ म्हणून त्यांना मिळालेली ख्याती,,गडकरी नंतर भाजप मध्ये लोकप्रियतेत राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा नेता,जन संपर्क कार्यालयात रात्री 2 वाजे पर्यंत जनतेच्या समस्या एकूण घेणारा,गोरगरीबांच्या दुःखात धावून जाणारा,देतांना या हाताचे त्या हाताला माहित न होऊ देणारा दिलदार माणूस,राजकारणा पलीकडे देशाचा,राज्याचा,समाजाचा विचार करणारा हळव्या मनाचा राजनेता एवढ्या फरकाने हरतो कसा..? याची मिमांसा होणे आवश्यक वाटते…
“यश आलं तर मजायचे नाही,अपयश आले तर लाजायचे नाही” हा त्यांचा गुरुमंत्र..! मात्र पराभवाचं हे अपयश एवढ्या फरकाने येईल,हा स्वप्नात देखील त्यांनी विचार केला नसावा…निश्चितच या पराभवावर ते आणी त्यांचे कार्यकर्ते मंथन करतीलच,पण जिथपर्यंत ते पोहचू शकणार नाही ती दुसरी बाजू मांडणं एक जागरूक पत्रकार म्हणून आवश्यक वाटते.
-बॉक्स-
मुनगंटीवार यांच्या पराभवाचे प्रमुख कारणे
1) शासकीय निधीतून बोटनिकल गार्डन,ताडोबा,बल्लारपूर संस्कृतिक इव्हेन्ट-
निवडणुकीच्या एन तोंडावर हे इव्हेन्ट झाल्याने विरोधकांना आयत कोलीत मिळालं.मुनगंटीवार जनतेच्या पैशातून आपला राजकीय प्रचार करत असल्याचा मोठा प्रचार विरोधकांनी केला,जणसामान्यात मतदारांपर्यंत ही बाब पोहचवण्यात ते यशस्वी झाले.
2)चंद्रपूरातील निर्भय बनो सभा
चंद्रपूरात आयोजित निर्भय बनो सभेला हजारोंच्या स्वयंपूर्त गर्दीने हजेरी लावली होती.भारतीय लोकशाही आणी संविधान वाचवण्यासाठी भाजपा उमेदवारांना धडा शिकविण्याचे आवाहन करत प्रत्येकांनी माऊथ पब्लिसीटी द्वारा हा विचार पोहचविण्याची विनंती वक्त्यांनी केली होती.त्याला उत्सुर्त प्रतिसाद देत उपस्थितीत हजारोंच्या संख्येनी घेतलेला प्रणही या प्रभावाला थोड्या अधिक प्रमाणात कारणीभूत ठरला.
3)चारशे पार झालो तर संविधान बदलवून टाकू..!
भाजपाच्या काही खासदारांनी हे देशद्रोही विधान केल्याने देश आणी संविधानाला मानणारा जागृत वर चिडला होता.भाजपांच्या उमेदवारांना हरवायचंच अशी खूनगाठ त्यांनी बांधली होती. त्यांचा खदखदनारा राग त्यांनी मतदानातून व्यक्त केला.
4)मुनगंटीवारांचे ते आक्षेपार्य विधान…
आणीबाणीच्या संबंधाने आपले मत मांडताना भावनिक होऊन त्यांनी “भावा- बहिणीच्या” संबंधाने केलेल्या विधानाला विरोधकांनी सामान्य मतदारां पर्यंत,विशेषतः महिला वर्गा पर्यंत पद्धतशीर आणी नियोजन बद्ध पद्धतीने पोहचवलं…त्यामुळे मुनगंटीवार यांच्या सारखा उच्विद्याविभूषित नेता असले विधान करूच कसा शकतो?या वर चौका चौकात,गल्लो गल्लीत चर्चा झाली.मतदारांत मोठा निगेटिव्ह मॅसेज गेला.त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला वर्ग विरोधात गेला.
5)मोंदींची सभा आणी चारसौं पार चा नारा…
चंद्रपूरतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भव्य दिव्य सभा झाली.मात्र या सभेचा मुनगंटीवार यांना कवडीचाही लाभ मिळाला नाही.उलट सभा एकूण येणारा वर्ग मोंदींना गर्विष्ठ,घमेंडखोर म्हणत “चारसौं पार चे भूत उतरवू” अशी चर्चा करत होते.
6)प्रामाणिक कार्यकर्त्यांची जागा ठेकेदारांनी घेतली
सुधीर मुनगंटीवार राज्याच्या सक्रिय राजकारणात आल्यापासून त्यांनी कार्यकर्त्यांना खूप जपलं.कार्यकर्ता म्हणजे पक्षाचा कणा असतो,ही त्यांची नेहमीच भूमिका असायची.त्यामुळे सत्तेचा पावर मिळाल्या बरोबर त्यांनी कार्यकर्त्यांना नेहमी विशेष महत्व दिल.त्यांचा आर्थिक जम बसावा म्हणून त्यांना विविध क्षेत्रात ठेके मिळवून देण्यास मदत केली.महत्वपूर्ण समित्यांवर त्यांना स्थापित केलं.अनेक नगर सेवक,सभापती,नगराध्यक्ष महापौर,उपमहापौर म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी पद भूषवली.पण या कार्यकर्ता कम ठेकेदारांनी फक्त ‘माया’ जमविण्याचे काम केले.स्लीपर घालणारे फोर व्हीलर घेऊन फिरू लागले.मात्र जनतेशी आणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी यांची नाळ तुटली.परिणामी हे ठेकेदार कम कार्यकर्ते (स्वयंघोषित स्थानिक नेते) दिसले की जनता यांच्यापासून दूर होऊ लागली…जनतेच्या स्थानिक समस्या सोडविण्यासाठी काही अपवाद वगळल्यास जनतेत काम करणारे कार्यकर्ते नसल्याने छोट्या छोट्या समस्या घेऊन लोक सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात जावून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत. पण जनतेच्या प्रत्येक समस्या सोडवून त्यांना समाधानी करणे एकट्या मुनगंटीवारांना कसे शक्य आहे?त्यामुळे असमाधी असलेला मतदार विरोधात गेला.
7) काही बोटावर मोजण्या इतकेच नेते/कार्यकर्ते प्रचारात सज्ज!
मुनगंटीवार आले की त्यांच्या पुढे पुढे करायचे,गेलेत की घरी आराम फर्मवायचा .यामुळे मुनगंटीवार यांचे विकास कार्य,त्यांचे व्हिजन सामान्य जनतेपर्यंत जनते पर्यंत पोहचविण्यास ते अपयशी ठरले.त्यातच कडक उन्ह असल्याने मुनगंटीवार यांचे कट्टर म्हणविले जाणारे (काही अपवाद वगळता) अनेक ठिकाणांचे स्थानिक पदाधिकारी आणी नेते कुठेच,आणी कुठल्या बूथवर गवसत नव्हते.
8) स्थानिक आणी जबाबदार
नेत्यांचा अती आत्मविश्वास नडला…
प्रचारांची धुरा असलेल्या नेत्यांना सुधीरभाऊ अजय आहेत,ते पराभूत होऊच शकत नाही,हा अति आत्मविश्वास असल्याने मुनगंटीवार यांना दिसण्या जोगे “फोटोछाप” थातूर मातुर कामे करून हे नेते व कार्यकर्ते वेळ मारून नेत होते.सोपावलेली कामे करण्यापेक्षा त्यांना मोदीजी,चारसौं पार, मुनगंटीवार यांचे अजय व्यक्तित्व अधिक महत्वाचे वाटत असल्याने ते बिनधास्त राहिले.त्यामुळे पक्षाच्या तळागाळातील सामान्य कार्यकर्त्याला व सामर्थकला “भाव” मिळाला नाही.या उलट इंडिया आघाडीचे कार्यकर्ते,नेते इमाने इतबारे जनते पर्यंत पोहचत होते.भर उन्हाताही पोलिंग बूथ वर आपले कर्तव्य बजावीत होते.
9)मुनगंटीवार यांना नियोजनाला वेळ मिळाला नाही.
माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांची तिकिट कापून मुनगंटीवार यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांना निवडणुकीचे नियोजन करण्यास वेळ अपुरा पडला.सुधीर मुनगंटीवार हे लहानातून लहान कार्यक्रमांचे नियोजनही स्वतः बघतात.छोट्या छोट्या त्रुटींवरही त्यांचे बारीक लक्ष असते.पण या वेळी लोकसभा निर्वाचन क्षेत्रात त्यांना एकहाती लक्ष घालणे शक्य झाले नाहो.यादव समाजातील नाराजी त्यांना दूर करता न आल्याने बऱाच यादव समाज विरोधात गेला.
10)महायुतीतील मित्र पक्षांचे अस्तित्व शून्य…
एनडीए महायुतीतील शिवसेना(शिंदे गट),मनसे,कवाडे गट, राष्ट्रवादी(अजित पवार गट)यांचे या लोकसभा मतदार संघात नाममात्र अस्तित्व आहे.याउलट इंडिया आघाडीतील काँग्रेसचे मित्र पक्ष आम आदमी पार्टी,शिव सेना(उद्धवं ठाकरे) राष्ट्रवादी (शरद पवार) यांचे बऱ्यापैकी अस्तित्व आणी काम आहे.कार्यकर्त्यांची फडी आहे.याचा मोठा लाभ प्रतिभा धानोरकर यांना मिळाला.लखोंच्या फरकाने सुधीर मुनगंटीवार यांना पराभवाचा सामना करावा लागला…