सोलापूर

जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी         -निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार

सोलापूर, दिनांक 16:-अल्पसंख्याकाच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधानांचा नवीन 15 कलमी कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी केले.

       जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा अल्पसंख्याक संनियंत्रण समितीच्या बैठकीत श्रीमती कुंभार बोलत होत्या. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रमेश काटकर, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

      निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती कुंभार पुढे म्हणाल्या की, अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी पंतप्रधानाचा नवीन 15 कलमी कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. माहे ऑक्टोबर 2009 मधील सुधारणाप्रमाणे या कार्यक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी होत असून शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, नियोजन विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पोलीस विभाग या सर्व विभागानी अल्पसंख्याक समाजातील पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांना सुलभरीत्या लाभ मिळण्याचे नियोजन करावे, असेही त्यांनी सुचित केले.

      प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी श्री. पवार यांनी मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौद्ध, पारसी व जैन या अल्पसंख्याक समुदायातील लाभार्थ्यांना 15 कलमी कार्यक्रमांतर्गत देण्यात येत असलेल्या लाभाची माहिती दिली. तसेच 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात येतो त्यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन भवन येथील सभागृहात अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आलेला असून जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असेही त्यांनी आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button