आपत्ती हाताळण्यास प्रशासन सज्ज; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये — जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड – जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू असून सद्यस्थितीत आपत्तीजनक, धोकादायक परिस्थिती नाही. संभाव्य आपत्तीची परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क व सज्ज आहेत. यामुळे नागरिकांनी काळजी करु नये. कोणतीही अडचण आल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून मदत घ्यावी. कोणत्याही अनधिकृत माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. शासन व स्थानिक प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे यांनी केले आहे.
महाडमधील पूर परिस्थितीची केली पाहणी
अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कोणतीही हानी होवू नये व नागरिकांना त्रास होवू नये म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महाड शहरासह तालुक्यातील पूर परिस्थितीची दुपारी पाहणी केली.
यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी डॉ.ज्ञानोबा बाणापुरे, पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे, तहसिलदार महेश शितोळे, मुख्याधिकारी कोळेकर यांच्यासह सर्व शासकीय विभागातील प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जावळे यांनी पूर परिस्थितीचा आणि प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांबाबतचा आढावा घेतल्यानंतर महाड शहरातील हुतात्मा अर्जुन भोई मार्गावरील पाण्यातून भोई घाटावर जाऊन एनडीआरएफच्या पथकाशी चर्चा केली. यानंतर दादली पुलावर जाऊन या ठिकाणच्या पाण्याची पाहणी केली.
महाड तालुक्यासह रायगड जिल्ह्यात त्याच बरोबर महाबळेश्वर येथे सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे महाड मधील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन श्री.जावळे यांनी यावेळी केले.