महाराष्ट्र

जलशक्ती अभियानातून सोलापूर जिल्हा जलयुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – राकेश कुमार मीना

सोलापूर, : केंद्रीय जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात जलसंधारणाचे विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी अत्यंत कृतिशील आराखडा तयार करावा. ग्राम पातळीवरील सर्व यंत्रणा, शालेय विद्यार्थी, नागरिक व शेतकरी यांच्या पर्यंत या अभियानाचे महत्त्व पटवून द्यावे. प्रत्येक ठिकाणी जलसंधारणाची अत्यंत दर्जेदार कामे करून सोलापूर जिल्हा जलयुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय जलशक्ती अभियानाचे नोडल अधिकारी राकेश कुमार मीना यांनी केले.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलशक्ती अभियानाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत श्री. मीना मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, कृषि उपसंचालक राजकुमार मोरे, जिल्हा परिषद जलसंधारण अधिकारी पारसे. एस. एस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. नाईकवाडी, सोलापूर महानगर पालिकेचे डंके, उपशिक्षणाधिकारी  प्राथमिक श्रीमती रुपाली भावसार  यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            नोडल अधिकारी श्री. मीना पुढे म्हणाले की, जलशक्ती अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागात झालेल्या कामांची पाहणी केली. ही सर्व कामे अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेली असून याच पद्धतीने जनशक्ती अभियानाअंतर्गत कृती आराखडा करत असताना कामे घ्यावीत. अमृत सरोवर योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात झालेले काम खूप चांगले असून या अंतर्गत 75 पेक्षा अधिक सरोवरात दुरुस्ती करून त्याची पाणी साठवण क्षमता वाढवली तसेच ते सरोवर पुन्हा जिवंत करण्याचे काम जलसंधारण विभागाने केलेले आहे, हे अत्यंत कौतुकास्पद काम असल्याचे त्यांनी सांगितले.

             जिल्ह्यात विविध ठिकाणी स्पॉट व्हिजिट करून जलसंधारणाचे कामे आराखड्यात घेत असताना ती तांत्रिकदृष्ट्या अत्यंत योग्य असली पाहिजेत याची खात्री करावी यासाठी जपानच्या तंत्रज्ञानाचा वापर करावा. या अभियानाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात जलसंधारणाची मोठ्या प्रमाणावर कामे प्रस्तावित करून ती कामे अत्यंत चांगल्या पद्धतीने होण्यासाठी जलसंधारण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे नियोजन करावे व सोलापूर जिल्हा पाणीटंचाई मधून बाहेर पडून जलयुक्त जिल्हा होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री. मीना यांनी केले. तसेच या अभियानाचे अधिक गतिमान पद्धतीने अंमलबजावणी होण्यासाठी महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर घ्यावा. व जलशक्ती से नारीशक्ती तक हे अभियानाचे असलेले ब्रीदवाक्य अगदी सार्थ ठरेल असे त्यांनी म्हटले. यावेळी केंद्रीय तांत्रिक अधिकारी श्रीमती पुर्णिमा बाराहते यांनीही सोलापूर जिल्ह्यातील जलसंधारणाच्या विशेषत: अमृत सरोवर योजनेत झालेल्या कामाविषयी समाधान व्यक्त केले.

             प्रारंभी जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा यांनी जिल्ह्यात जलसंधारण विभागाच्या विविध शाखा मार्फत करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली. तर कृषी उपसंचालक राजकुमार मोरे यांनी कृषी विभागाच्या वतीने जलसंधारण मध्ये करण्यात येत असलेल्या कामांची माहिती विशद केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button