उजनी जलाशयात 7 दिवसात आले 10 टक्के पाणी, पाणीसाठ्यात 5 टीएमसी ने वाढ….

बेंबळे : उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात मागील सात दिवसात १०.०९ टक्के वाढ झालेली असून जलाशयातील पाणी पातळीत ५.१५ टीएमसीने वाढ झालेली दिसून येत आहे, अद्याप जलाशयात वजा – 50.38 टक्के पाणी असून दौंड वरून येणारा पाण्याचा विसर्ग फक्त 3 हजार 472 क्युसेक्स एवढा आहे. मागील पाच जून पासून पुणे जिल्हा व परिसरात झालेल्या पावसामुळे उजनीच्या वरील 20 लहान मोठ्या धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे. मुळा-मुठा पावना इंद्रायणी या मुख्य नद्यातून भीमा नदीत येणारा प्रवाह मंदावला असला तरी उजनी धरण जलाशयाच्या परिसरात दररोज काही प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे धरणातील पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ होत आहे. उजनी धरण 111 टक्के पूर्णक्षमतेने भरण्यासाठी व १२३ टीएमसी पाणीसाठा होण्यासाठी यापुढे एकुण 161% पाणी धरणात येणे आवश्यक आहे, कारण सध्याची वजा -50% पाणी पातळी +0% वर येऊन पुन्हा 111% पर्यंत यावी लागणार आहे. 14 जून रोजी उजनीच्या वरील धरणातील सुधारित पाण्याची टक्केवारी याप्रमाणे. पिंपळगाव जोगे 3 टक्के ,माणिक डोह 4 टक्के, येडगाव 38%, वडज 5 टक्के, डिंभे 2 टक्के, घोड 2 टक्के, विसापूर 6 टक्के, कळमोडी 19% चासकमान 7 टक्के, भामा आसखेडा 15%, वडिवळे 43 टक्के, आंध्रा 25 टक्के ,पावना 21 टक्के ,कासार साई 28% ,मुळशी 8 टक्के, टेमघर 2 टक्के, वरसगाव 13 टक्के , पानशेत 14 टक्के , खडकवासला 42 टक्के आणि गुंजवणी 12 टक्के. याच प्रमाणे सध्या निरा खोऱ्यातील निरादेवधर ,भाटघर ,वीर, नाझरे व चिल्हेवाडी या धरणाच्या पाणी साठ्यात काही प्रमाणात वाढ होत आहे. फलटण माळशिरस खंडाळा आदी तालुक्यातील परिसरात होत असलेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ होत असल्याचे सांगण्यात येते. माळशिरस तालुक्यात होणाऱ्या पावसामुळे निरा नदीतील प्रवाहात पाणी वाढले असून नरसिंगपूर येथे निराभिमा संगमा नंतर भीमा नदीतील पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. आगामी पावसाळ्यात पुणे जिल्ह्यात मोठ्या पावसाची गरज असून हजारो, लाखो क्युसेक्सने पाणी उजनी धरणात येणे अपेक्षित आहे, तरच 15 ऑक्टोबर 24 पर्यंत उजनी धरण नियोजित पातळी पर्यंत पोहोचू शकते असे अभ्यासू व्यक्तींचे मत आहे.