हिंदू जन आक्रोश मोर्चात हुल्लडबाजी करणारा समाजकंटकावर कारवाई करा : विष्णू कारमपुरी

सोलापूर : सोलापुरातील वक्फ् बोर्ड कायद्यामुळे हिंदूवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी दिनांक 06/01/2024 शनिवार रोजी, तेलंगणाचे भाजपाचे आमदार टी.राजसिंग व भाजपाचे नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चात घुसून हुल्लडबाजी करणाऱ्या समाजकंटकांचा शोध लावून, त्यांच्यावर कठोर कारवाई करा. अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर महानगरप्रमुख व महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.
सोलापुरातील वक्फ् बोर्डच्या कायद्यांतर्गत, काही भागात हिंदू कुटुंबीय राहतात त्या कुटुंबीयांना या कायद्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे. म्हणून सकल हिंदू समाजाच्या वतीने 06 जानेवारी रोजी भारतीय जनता पक्षाचे तेलंगणा आमदार टी.राजसिंग व मुंबईचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कन्ना चौक पर्यंत काढलेल्या मोर्चात कोंतम चौक परिसरात आल्यानंतर मोर्चात काही बाहेरील समाजकंटक घुसून त्या परिसरातील विशिष्ट जमातीच्या दुकानावर दगड व बॉटलचा वर्षाव केला. यावरून मोर्चात घुसलेले समाजकंटक हे सोलापूरची शांतता व सुव्यवस्था,आणि सामाजिक सलोखा बिघडविण्याचा उद्देश होता हे स्पष्ट दिसून येते.
यापूर्वी तेलंगणा आ. टी. राजसिंग यांची सभा सोलापुरात आयोजित केली होती . त्यावेळी सभेसाठी रॅलीचे आयोजन केले होते. त्यावेळी देखील अशीच हुल्लडबाजी करून गोंधळ घातला होता. यावरून हिंदूंच्या कुठल्याही मोर्चात व जल्लोष यात्रेत घुसून हिंदूंना बदनाम करणे आणि सोलापूर शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न वारंवार होत असल्याचे दिसून येते. येणाऱ्या काळात ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांची यात्रा, विविध उत्सव आदी समारंभ मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यावेळी देखील हे समाजकंटक अशा अप्रिय घटना करण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अशा समाजकंटकांचा शोध लावून त्यांच्यावर कठोर कारवाई करून, सोलापूरची शांतता अबाधित राहावी अशी मागणी करण्यात येत आहे. असे कारमपुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.