महाराष्ट्र

फाळणीच्या वेळी लाखो लोकांचे जीव वाचविण्यात रेल्वे सेवा महत्वपूर्ण : मुख्य प्रकल्प व्यवस्थापक शैलेंद्र सिंह परिहार यांचे प्रतिपादन

विभाजन स्मृती दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मल्टीमिडिया प्रदर्शन प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असणार

सोलापूर, :  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठया उत्साहाने साजरा करत असताना आपल्याला १४ ऑगस्ट १९४७ रोजी घडलेल्या फाळणीच्या वेदना देखील मनाला खिन्न करून जातात. देशाला भोगाव्या लागलेल्या  फाळणीच्या  वेदना कधीही विसरता येणार नाहीत. द्वेष आणि हिंसाचारामुळे घडलेल्या दंगलीत लाखो लोकांचे प्राण वाचविण्यात रेल्वेने अत्यंत महत्वाची भूमिका निभावली आहे. आपल्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट हा “फाळणी स्मृती दिन” म्हणून देशभर पाळला जात आहे. असे प्रतिपादन रेल्वेचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक शैलेंद्र सिंह परिहार यांनी आज येथे केले.

         फाळणी वेदना स्मृतीदिन, हर घर तिरंगा आणि भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर व मध्‍य रेल्‍वे सोलापूर विभाग यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित प्रदर्शनाचे उदघाटन हैद्राबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रेय हिबारे यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले. भारत-पाक फाळणीत घडलेल्या घटना, घडामोडी आणि भारतीय स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या महत्वपूर्ण घटना, ऐतिहासिक स्थळे, ज्ञात व अज्ञात क्रांतिकारक आणि राष्ट्रपुरुषांची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे मल्टीमीडिया प्रदर्शन रेल्वे स्टेशन येथे भरविण्यात आले आहे. चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी श्री परिहार बोलत होते.

          यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी ए पी भगत, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार, रेल्वेचे सिव्हील अभियंता अरुण गणेरे, सहायक वाणिज्य व्यवस्थापक लखनजी झा, सहायक कार्मिक अधिकारी शेख मस्तान, रेल्वे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ आनंद कांबळे, सुभेदार शिवाजी माने, अखिल भारतीय माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अरुणकुमार तळीखेडे, रेल्वे जनसंपर्क अधिकारी यश जनबंधू आणि सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

          श्री परिहार म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्या दिनानिमित्त लावण्यात आलेले दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यामध्ये बलिदान दिलेल्या थोर व्यक्तींना या निमित्ताने अभिवादन करतो. देशातील अतिशय दुर्मिळ छायाचित्रांचे हे प्रदर्शन असून सर्व नागरिकांनी आवर्जून पहावे. आपल्याला भेदभाव, वैमनस्य आणि द्वेषभावनेच्या विषाला संपवण्यासाठी प्रेरित करण्या बरोबरच एकता, सामाजिक सद्‌भावना आणि मानवीय संवेदनाही सशक्त करायचा आहेत. सोलापूर रेल्वे स्टेशनवर लावण्यात आलेल्या प्रदर्शनीला प्रत्येक सोलापुराकारानी येऊन बघण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

          अतिरिक्त जिल्हाधिकारी ठाकूर म्हणाल्या, 15 ऑगस्ट ,1947 रोजी भारताने  ब्रिटिश राजवटी पासून स्वातंत्र्य मिळवले. स्वातंत्र्य दिन हा कोणत्याही राष्ट्रासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा प्रसंग असतो; मात्र, स्वातंत्र्याच्या गोडव्यासह  फाळणीचे दुःखही येते.  नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतीय राष्ट्राच्या जन्माबरोबरच  फाळणीच्या हिंसक वेदनाही होत्या ज्यांनी लाखो भारतीयांवर कायमचे वेदना सोडले आहेत. फाळणीमुळे मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या स्थलांतरांमुळे सुमारे 20 दशलक्ष लोक प्रभावित झाले. लाखो कुटुंबांना त्यांची वडिलोपार्जित गावे/शहरे सोडावी लागली आणि त्यांना निर्वासित म्हणून नवीन आयुष्य शोधावे लागले असे त्यांनी सांगितले.

           प्रास्ताविकेत अंकुश चव्हाण म्हणाले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेले हे प्रदर्शन युवा पिढीसाठी उपयुक्त आहे. स्वातंत्र्य काळातील त्याग, बलिदान, अत्याचार या इतिहासाची आठवण सर्वांना व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाबरोबर फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्तच्या प्रदर्शनात लावण्यात आलेल्या दुर्मिळ चित्रांची माहिती लोकांनी घ्यावी आणि या प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

           मेजर तुंगार म्हणाले, केंद्रीय संचार ब्युरोने लावलेले स्वातंत्र्य संग्रामावरील प्रदर्शन बघितल्यावर संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर येत आहे. हे प्रदर्शन जास्तीत जास्त युवापिढीने पाहावे. भारतीय सैनिक आणि माजी सैनिक यांना अश्या शासकीय कार्यक्रमाला निमंत्रित करून यथोचित सन्मान केला जातो हे अत्यंत कौतुकास्पद आहे. यामुळे सैनिक आणि जनसामान्य लोकांमध्ये देशाअभिमान वाढण्यास मदत होते.

            कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी “भारत-पाक विभाजन आणि भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील प्रत्येक घडामोडीवर लावणेत आलेल्या दुर्मिळ छायचित्रांचे अतिशय अभ्यासपूर्ण माहिती उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांना सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी दिली.

           माजी सैनिक अरुण तळीखेडे यांनी भारतीय सैन्याचे कार्य आणि स्वातंत्र्य संग्रामाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. रेल्वे स्टेशनवरील प्रदर्शन आजपासून १६ ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

           सदर प्रदर्शनामध्ये १९४७ वेळी झालेल्या फाळणीचे चित्र, १७५७ ची प्लासीची लढाई, संन्यासी विद्रोह, कित्तूर विद्रोह, १८५७ लढ्यातील महान क्रांतिकारक राणी लक्ष्मीबाई, झलकारी बाई, मंगल पांडे, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बेगम हजरत महल यांचे छायाचित्र व मजकूर, राजाराममोहन रॉय, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, रवींद्रनाथ टागोर, डॉ अ‍ॅनी बेझंट, पंडिता रमाबाई, मॅडम भिकाजी कामा, डॉ श्यामजी कृष्णा वर्मा, लाला हरदयाळ, अरविंद घोष, लाला लजपतराय, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, चाफेकर बंधू, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, खान अब्दुल गफार खान, नेताजी सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, अश्फाक उल्ला, सरोजिनी नायडू, अरुणा असफली, उषा मेहता इत्यादी स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना. चंपारण सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, असहयोग आणि खिलाफत चळवळ, बार्डोली सत्याग्रह, चौराचौरी, काकोरी काण्ड, चितगाव शस्त्रागार, हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, सविनय कायदेभंग, दांडी यात्रा, चलेजाव आंदोलन, भारत-पाक फाळणी, स्वातंत्र्यदिन, संस्थानचे विलीनीकरण आणि संविधान सभा आदी महत्वपूर्ण घटनांचे दुर्मिळ छायाचित्र आणि मजकूरांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.

             कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अंबादास यादव यांनी केले. भैरव मार्तंड कला पथक पंढरपूर यांनी विविध देशभक्तीपर गीते गाऊन प्रबोधन केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कार्मिक विभागाचे महावीर निमाणी, अमर झा, पंकज कुमार, रशीद शेख, अरविंद खडाखडे, बसवराज बिराजदार, केंद्रीय संचार ब्युरो चे कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, रेल्वे स्टेशन मास्तर सी एल मीना, एस मीना, मुख्य टेलिकॉम निरीक्षक क्लिपर्रड अँथनी, रुपेश नागणसूरे, पूजा माने, साक्षी गायगवळी,  साईराज राउळ, किरण गवळी, रेल्वे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button