प्रधानमंत्री पिक विमा योजना: पिक नुकसानाची माहिती 72 तासात विमा कंपनीस कळवा
सोलापूर,दि.30:- जिल्हयामध्ये सद्यस्थितीत परतीच्या पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान झालेचे निदर्शनास आलेले असून पिकाचे नुकसान झालेले असल्यास विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळणेसाठी झालेल्या नुकसानीची पुर्वसुचना संबंधीत विमा कंपनीस 72 तासामध्ये कळवावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2024 या हंगामाकरीता अधिसुचीत क्षेत्रातील अधिसुचीत पिकांसाठी राबविण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी खरीप 2024 मध्ये ओरियंटल इन्सुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पिक विमा योजनेतर्गत खरीप 2024 मध्ये जिल्ह्यातील 7 लाख 33 हजार 303 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो. विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती, पुर्वसुचना कंपनीस देणे गरजेचे आहे.
नुकसानीबाबतची सुचना पिक विमा कंपनीकडे नोंद करण्यासाठी पिक विमा ॲप अथवा कृषि रक्षक पोर्टल टोल फ्री क्रमांक 14447 या क्रमांकाचा वापर करावा. परंतु पिकविमा ॲप, कृषि रक्षक पोर्टल याद्वारे नुकसानीची सुचना देताना शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी नुकसानीची सुचना देण्यासाठी कंपनीमार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असुन त्यासाठी शेतकऱ्यांनी www.orientalinsurance.org.in या वेबसाईटवर जाऊन उजव्या बाजूला खाली ASKORIN या आयकॉनला क्लिक करावे व त्यामध्ये PMFBY Claims मध्ये जाऊन नुकसानीची सुचना नोंदवावी.
तसेच याबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास विमा कंपनीचे तालुकास्तरावरील प्रतिनिधी, बँक व तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे संपर्क करावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.