सामाजिक उपक्रम

“जल-मित्र” पुरस्कार मा. प्रा. डॉ. रामचंद्र मोरवंचीकर यांना देण्यात येणार

महाराष्ट्र विकास केंद्र पुणे या सेवा संस्थेच्यावतीने दरवर्षी पाण्याच्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस “जल-मित्र” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे हे अकरावे वर्ष असून यावर्षीचा (सन २०२३) “जल-मित्र” पुरस्कार मा. प्रा. डॉ. रामचंद्र मोरवंचीकर यांना देण्यात येत आहे.
पुरस्कार प्रदान सोहळा भारत सरकारच्या अर्थखात्याचे राज्यमंत्री मा. ना. डॉ.भागवत कराड यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्राच्या संत परंपरेतील श्री संत एकनाथ महाराज संस्थानचे संस्थानाधिपती ह.भ.प. श्रध्देय रावसाहेब महाराज गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली व निवृत्त सनदी अधिकारी तथा महावितरणचे माजी संचालक मा. डॉ. नरेश गिते (भा.प्र.से.) आणि गोदामाई सेवा समिती नाशिकचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मा. देवांग जानी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार, दि. २३/१२/२०२३ रोजी दुपारी ४.०० वा. हॉटेल जानकी एक्झिक्युटीव्ह सभागृह, ७ हिल फ्लायओव्हर जवळ, विद्यानगर, सिडको, औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे.
महाराष्ट्र विकास केंद्र ही संस्था २००० सालापासून महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नाचा अभ्यास करीत आहे. तसेच पाण्याच्या विविध प्रश्नांबाबत अनेक उपक्रम राबवत आहे. महाराष्ट्रातील पाणी उपलब्धता व त्याचे नियोजन हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय बनला आहे. कारण महाराष्ट्राचे शहरीकरण अत्यंत वेगाने होत असून महाराष्ट्रातील जवळपास ५०% लोकसंख्या शहरात राहते. यामुळे साहजिकच समन्यायी वाटपाचे सुत्र अद्यापही सरकारला मांडता आले नाही. संपूर्ण जगभर नदी खोरेनिहाय जल व्यवस्थापन ही संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न सुरु असताना आपल्या राज्यात मात्र या संकल्पनेस अनुसरुन नियोजनाच्या बाबतीत राज्य शासन अनुत्सुक असल्याचे भासते. तसेच महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नद्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झालेल्या आहेत. पाणी हे जीवन आहे असे आपण मानत असलो तरी पाण्याकडे बघण्याचा दृष्टीकोनच सरकार व सर्वसामान्य जनतेचा बदलत आहे.
या पार्श्वभुमीवर मा. प्रा. डॉ. रामचंद्र मोरवंचीकर यांनी जल व पर्यावरण क्षेत्रात केलल्या उल्लेखनीय कार्यामुळे आपला जलाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून जातो व जलक्षेत्राचे सामाजिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक मूल्य याकडे आपला दृष्टीक्षेप जातो. त्यांनी भारतीयजल संस्कृतीचा जाज्वल्य इतिहास ग्रंथरूपाने समस्त भारतीयां समोर ठेवला असून आपल्या पिढ्यांसाठी तो एक अमूल्य ठेवा आहे. याबरोबरच भारतीय जल संस्कृती मंडळाच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्या या कामाची ओळख महाराष्ट्राला व्हावी तसेच समाजाला स्फुर्ती मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र विकास केंद्र मा. प्रा. डॉ. रामचंद्र मोरवंचीकर यांना “जल-मित्र” पुरस्काराने सन्मानित करीत आहे.
मा. प्रा. डॉ. रामचंद्र मोरवंचीकर यांचा हा उपक्रम अभिनंदनीय तर आहेच परंतु नैसर्गिक जलस्त्रोतांच्या संवर्धनासाठी, बळकटीकरणासाठी व प्रत्येक नदी खोन्यात राहणाऱ्या सर्वांना पाणी विषयक हजारो वर्षाची माहिती उपलब्ध करुन देणारा दस्तऐवज ऐतिहासिक तसेच अनमोल देखील आहे. म्हणूनच आम्ही २०२३ सालचा “जल-मित्र” पुरस्कार मा. प्रा. डॉ. रामचंद्र मोरवंचीकर यांना प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील व जलमित्र निवड समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेलार यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button