सोलापूर

जनहित शेतकरी संघटनेचे बोंबाबोंब आंदोलन

सोलापूर,दि.20  बार्शी तालुक्यातील सासुरे येथील ग्रामविकास मंडळाच्या बोगस रेकॉर्डची चौकशी करावी, तसेच संस्थेशी काही संबंध नसताना विकास पाटील व महंमद सय्यदसो शेख यांनी केलेल्या बेकायदेशीर बाबींची चौकशी करून पी.टी. आर वरील सदस्यांनी केलेल्या संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या सह्या ग्राह्य धरून दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे देशमुख यांच्यासह संस्था सचिव बापूसाहेब नेमाणे, संचालक रामचंद्र करंडे, युवराज करंडे आदींनी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन बोगस बाबींची माहिती दिली. यावेळी दिलेल्या निवेदनात ग्रामविकास मंडळ संस्थेच्या पी.टी.आर. सदस्यांनी 1 जुलै 2017 रोजी सचिव म्हणून बापूसाहेब नेमाणे व अध्यक्ष म्हणून बाळासाहेब पाटील यांची निवड केलेली आहे. असे असताना या संस्थेशी काही संबंध नसताना विकास पाटील यांनी बोगस लेटर पॅड तयार करुन भैरवनाथ प्रशाला केवड, ता. माढा येथील सहशिक्षिका सुनंदा बनसोडे यांचा 1 जुलै ते 30 नोव्हेंबर 2022 काळातील प्रभारी मुख्याध्यापक पदाचा प्रस्ताव तयार करुन त्यास शिक्षण विभागाची मान्यता घेत शासनाची फसवणूक केली आहे. तसेच महंमद शेख यांनी मी सचिव पदाचा चार्ज नेमाणे यांच्याकडे दिला असून मी सचिव पदावर कार्यरत नाही, असे अ‍ॅफिडेव्हिट करुन दिले असतानासुध्दा शेख यांनी सचिव पदाचे अधिकार नसताना केवड शाखेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेच्या पेन्शन पेपरवर सह्या करुन पेन्शन मंजूर केली आहे. तसेच सहशिक्षिका सुनंदा बनसोडे व  सहशिक्षक रघुनाथ मिरगणे या दोघांना डी.एड वरुन बी.एड स्केलचा प्रस्ताव दाखल करुन त्यास शिक्षण विभागाची मान्यता घेत शासनाची फसवूणक केली आहे. तसेच सेवा ज्येष्ठ शिक्षक नसताना भाऊसाहेब पाटील यांना जीवन विकास प्रशाला, सासुरे येथे प्रभारी मुख्याध्यापक व पुढे मुख्याध्यापक पदाचा प्रस्ताव तयार करुन त्यास शिक्षण विभागाची मान्यता घेतली आहे. अधिकार नसताना शेख यांनी भैरवनाथ प्रशाला केवड या शाळेचे ऑडिट नसताना व शालेय पोषण आहाराचे प्रकरण प्रलंबित असताना सेवानिवृत्त मुख्याध्यापिका माने व  मुख्याध्यापिका बनसोडे यांच्या पेन्शन पेपरवर सह्या करून पेन्शन मंजूर करत शिक्षण विभागाची फसवणूक केली आहे. तरी बोगस सचिव व सचिव पदावर नाही असे प्रतिज्ञापत्र देऊनसुध्दा कागदपत्रावर सह्या करणारे शेख यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच वारंवार शिक्षण विभागाला लेखी कळवूनसुध्दा बोगस प्रस्ताव स्वीकारुन मान्यता देणारे त्या त्या वेळचे माध्यमिक शिक्षण विभागाचे लिपिक  व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची चौकशी करुन त्यावर कायदेशीर कारवाई करावी, सर्व बेकायदा नेमणुका रद्द कराव्यात, असे नमूद केले आहे. यावेळी  जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी आव्हाळे या प्रकरणाची शिक्षण विभागाकडून चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन दिले. यावेळी बाबासाहेब साबळे, देविदास करंडे, सुनील करंडे रवींद्र मुठाळ अंकुश वाघमारे, अनिल आवारे, किरण करंडे, विशाल करंडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button